रत्नागिरी
Amba Ghat; आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी पूर्ण बंद
मुसळधार पावसाचा फटका आता नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटालाही बसला आहे. घाटातील रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल (Manuj Jindal) यांनी हा आदेश जारी केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अहवालानुसार रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर भेगा पडल्या असून या ठिकाणी सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हातखंबा टॅपसह घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर महामार्ग पोलीस तैनात करण्यात आले असून बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि हलक्या प्रवासी वाहनांना नियंत्रित वेगाने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
अवजड वाहनांसाठी हातखंबा-पाली-अणुस्कुरा घाट मार्ग तसेच भुईबावडा आणि फोंडा घाट हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.









