आदेश कागदावरच; धामणदेवीतील (Dhamandevi) केमिकलयुक्त कंटेनर हटविण्याची कारवाई रखडली!
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील विरंगुळा हॉटेलजवळ धामणदेवी (Dhamandevi) हद्दीत कथितरीत्या शासकीय परवानगीविना केमिकलयुक्त रिकामे व भरलेले कंटेनर साठविल्याच्या तक्रारीवरून उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना कारवाईचे निर्देश देऊनही अद्याप प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा विषय गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहे.
धामणदेवी येथील गट नं. १३८/३/क/१०/ब/११ब/१२/१ या जागेत केमिकलयुक्त कंटेनर साठविले जात असल्याबाबत भाजपचे खेड दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद शांताराम चाळके यांनी २१ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी, खेड यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी २४ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते.
या ठिकाणी परवानगीविना केमिकलयुक्त कंटेनर साठविल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. तसेच प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले होते.









