छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या राहुलची 106 तासांच्या बचाव मोहिमेनंतर मंगळवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली. बचावानंतर लगेचच त्याला बिलासपूरच्या अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आले. शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहुल 60 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराने हे ऑपरेशन अविरत आणि अथकपणे पार पाडले. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हे देशातील सर्वात मोठे बचाव कार्य असल्याचे बोलले जात आहे.

खड्ड्यात सापही आला

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. ते राहुलच्या नातेवाइकांच्या संपर्कातही होते. मंगळवारी रात्री त्यांनी सोशल मीडियावर बचाव कार्याच्या यशाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मोहिमेदरम्यान एक सापही खड्ड्यात आला होता. पण धोका टळला. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते.

बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर राहुलला बिलासपूरच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुलला बाहेर काढताच जवानांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. लोकांनी टाळ्या वाजवून बचाव पथकाचे कौतुक केले. लोकांनी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांशी हस्तांदोलन केले.

कॅमेराद्वारे निगराणी

पाच दिवसांपासून राहुलवर खास कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत होती. त्याला अन्न आणि पाणी दिले जात होते. उत्साह कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी सतत बोलणे सुरू होते. पाच दिवसांपासून 60 फूट खाली गाडल्यामुळे आणि खड्ड्यात पाणी असल्याने त्याच्या अंगात अशक्तपणा आला आहे.राहुलची सुखरूप सुटका केल्यानंतर लोकांनी बचाव पथकाचे कौतुक केले.

कसे झाले बचावकार्य?

सैन्याच्या जवानांनी बचावकार्याची सूत्रे हातात घेतली. बोगद्यातून ते आधी बोअरवेल आणि नंतर राहुलपर्यंत पोहोचले. राहुल आत असल्याने वाटेतील खडक ड्रिलिंग मशिनने नव्हे तर हाताने तोडले गेले, त्यानंतर आतील माती काढण्यात आली. एवढी मेहनत घेऊन जवान राहुलपर्यंत पोहोचले. यानंतर राहुलला दोरीने ओढून बाहेर काढण्यात आले. त्याची प्रकृती पाहता रुग्णवाहिका, डॉक्टरांची टीम आणि वैद्यकीय उपकरणे आधीच सज्ज होती. बोगद्यापासून अॅम्ब्युलन्सपर्यंत एक कॉरिडॉर करण्यात आला. राहुलला स्ट्रेचरमधून थेट रुग्णवाहिकेत आणण्यात आले.मुलाला इजा होऊ नये म्हणून बोगद्याचा मोठा भाग हाताने तयार करण्यात आला होता.

असे पोहोचले पथक

एनडीआरएफच्या टीमला विश्रांती देण्यासाठी जवानांनी सूत्रे हाती घेतल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. हे संयुक्त ऑपरेशन होते. प्रश्न मुलाच्या जीवनाचा होता, त्यामुळे खडक फोडण्यासाठी उपकरणापेक्षा हात वापरले गेले. सैनिक हाताने माती काढत होते आणि कोपराच्या सहाय्याने पुढे सरकत होते. हळूहळू तो क्षण आला जेव्हा बनवलेला बोगदा बोअरवेलला भिडला. तेथे राहुल आतल्या खडकावर असल्याचे सैनिकांना दिसले. बाहेर माहिती देण्यात आली आणि जमावाने भारत माता की जयच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.मुलाला रुग्णवाहिकेतून बिलासपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

10 जूनला राहुल बोअरवेलमध्ये पडला

शुक्रवारी दुपारी 2 वाजेपासून राहुल साहू (10) याची काहीही माहिती नव्हती. घरातील काही लोक बोअरवेलच्या दिशेने गेले तेव्हा राहुलच्या रडण्याचा आवाज येत होता. खड्ड्याजवळ गेल्यावर आतून आवाज येत असल्याचे दिसून आले. बोअरवेलचा खड्डा 60 फूट खोल होता.

राहुल बधिर, मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्यामुळे तो शाळेतही गेला नाही, असेही सांगण्यात आले आहे. तो घरीच राहत होता. संपूर्ण गावातील लोकसुद्धा 2 दिवस त्याच ठिकाणी थांबले होते, जिथे मूल पडले होते. राहुल हा त्याच्या आई-वडिलांचा मोठा मुलगा. त्याचा एक भाऊ 2 वर्षांनी लहान आहे. वडिलांचे गावात भांड्यांचे दुकान आहे.

Google search engine
Previous articleजागतिक रक्तदाता दिन : दुर्मिळ रक्तगटाच्या दानाची पन्नाशी
Next articleछान किती दिसते फुलपाखरू! देशातील सर्वात मोठे सदर्न बर्डविंग फुलपाखरू कोल्हापुरात आढळले, पर्यटकांची झुंबड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here